अक्षय कर्डिले यांच्या पाठपुराव्याला यश; वांबोरी चारीला ४ फेब्रुवारीला पाणी
राहुरी वेब प्रतिनिधी,१ फेब्रुवारी ( शरद पाचारणे) : वांबोरी चारी लाभधारक क्षेत्रातील शेतकऱ्यांच्या पाण्याच्या प्रश्नासाठी युवानेते अक्षय कर्डिले यांनी केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश आले असून येत्या ४ फेब्रुवारी रोजी वांबोरी चारीला पाणी सोडण्यात येणार आहे. यामुळे पाथर्डी व वांबोरी परिसरातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.
या भागातील शेती पूर्णपणे पाण्यावर अवलंबून असल्याने चारीत तातडीने पाणी सोडावे, अशी मागणी शेतकरी करत होते. शेतकऱ्यांच्या वतीने युवानेते अक्षय कर्डिले यांनी जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची भेट घेऊन परिस्थिती मांडली. कर्डिले यांच्या पाठपुराव्याची दखल घेत मंत्र्यांनी मुळा धरण प्रशासनाला वांबोरी चारीत पाणी सोडण्याच्या स्पष्ट सूचना दिल्या.
त्याअनुषंगाने ४ फेब्रुवारी रोजी लाभधारक गावांतील शेतकरी व पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत वांबोरी चारीला पाणी सोडण्यात येणार असल्याची माहिती अक्षय कर्डिले यांनी दिली. वेळेवर पाणी मिळाल्यास रब्बी हंगामातील पिकांना मोठा आधार मिळणार असून शेती उत्पादनात वाढ होण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.
शेतकऱ्यांच्या अडचणींसाठी तत्परतेने पुढाकार घेतल्याबद्दल परिसरातील शेतकरीवर्गाने युवा नेते अक्षय कर्डिले यांचे आभार मानले आहेत.