राहुरी (वेब प्रतिनिधी शरद पाचारणे) दि. २९ सप्टेंबर :
राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा परिसरात अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणावर पिकांचे नुकसान झाले आहे. या नुकसानीची दखल घेऊन पिकांचे सरसकट पंचनामे करून शेतकऱ्यांना कर्जमाफी व ओला दुष्काळ जाहीर करावा, अशी ठाम मागणी देवळाली प्रवरा येथील सर्वपक्षीय शिष्टमंडळाने राहुरीचे तहसीलदार नामदेव पाटील यांच्याकडे निवेदनाद्वारे केली.
या निवेदनावर आप्पासाहेब भिमराज ढूस, शैलेंद्र शरदचंद्र कदम, विठ्ठल रंगनाथ चव्हाण, केदारनाथ रंगनाथ चव्हाण, बबनराव गजाबापू मुसमाडे, अरुण सुखदेव वाळके, सुभाष प्रकाश वाकळे, आदिनाथ रंभाजी कराळे, अरुण गणपत हारदे यांच्यासह अन्य नागरिकांच्या स्वाक्षऱ्या असून तहसीलदारांना हे निवेदन समक्ष देण्यात आले.
निवेदनात म्हटले आहे की, २७ व २८ सप्टेंबर रोजी झालेल्या अतिवृष्टी सदृश्य पावसाने सोयाबीन, कपाशी, तूर, मका, मुग, घास, आले, ऊस आदी पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. तथापि, राहुरी तालुक्यातील पर्जन्यमापक यंत्रणा कुचकामी ठरत असल्याने शासनाच्या यादीत तालुक्याचा समावेश झाला नाही. त्यामुळे मदतीपासून शेतकरी वंचित राहण्याची शक्यता आहे.
देवळाली प्रवरा शहरात आलेल्या पूरामुळे अनेक रस्ते वाहून गेले असून शेतजमिनी पाण्याखाली गेल्याने जवळपास सर्वच पिके नष्ट झाली आहेत. त्यामुळे येथील शेतकऱ्यांना तातडीने मदत मिळावी, सरसकट पंचनामे करून शासनाकडे अहवाल पाठवावा आणि पंजाब प्रांतातील शेतकऱ्यांना जशी मदत मिळाली तशीच मदत महाराष्ट्र शासनाने द्यावी, अशीही मागणी करण्यात आली आहे.
यावेळी आप्पासाहेब ढूस, शैलेंद्र कदम, केदारनाथ चव्हाण आदींनी सांगितले की, “शेतकऱ्यांचे सरसकट पंचनामे करण्याची आमची मागणी तहसीलदारांकडे मांडली असून त्यांनी शासनाच्या आदेशाने तातडीने कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले आहे. त्यामुळे लवकरच पंचनामे सुरू होतील अशी अपेक्षा आहे.”