राहुरी वेब प्रतिनिधी,११ ( शरद पाचारणे ):-
राहुरी नगरपरिषदेच्या ढिसाळ कारभाराचा फटका येथील नागरिकांना बसत असून, स्वच्छतेचा अभाव, खराब पथदिवे आणि पिण्याच्या पाण्याची समस्या अशा मूलभूत सुविधांपासून नागरिक वंचित आहेत. याबाबत नागरिकांनी नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी यांना निवेदन देऊन तातडीने लक्ष घालण्याची मागणी माजी उपनगराध्यक्ष रावसाहेब उर्फ आर.आर.तनपुरे यांनी केली आहे.
दिलेल्या निवेदनात म्हटले आहे कि, राहुरी नगरपरिषद हद्दीतील सर्व प्रभागांमध्ये नालेसफाई आणि जंतुनाशक फवारणी वेळेवर होत नसल्याने डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे. यामुळे रोगराई पसरण्याची भीती नागरिकांनी व्यक्त केली आहे. मागील पावसात शहरातील जे.सी.बी.ने गाळ काढला होता, परंतु तो योग्यरित्या न काढल्याने पावसामुळे तो पुन्हा नाल्यात जमा होऊन दुर्गंधी पसरत आहे.
नगरपरिषद हद्दीतील शहरी व ग्रामीण भागातील पथदिवे बंद असल्याने रात्रीच्या वेळी अंधाराचे साम्राज्य पसरले आहे. यामुळे अपघात आणि गुन्हेगारीचा धोका वाढला आहे. याबाबत वारंवार तक्रारी करूनही परिस्थिती ‘जैसे थे’ असल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आहे.नागरिकांनी नगरपरिषदेकडे तातडीने नालेसफाई, जंतुनाशक फवारणी, पथदिव्यांची दुरुस्ती आणि पिण्याच्या पाण्याची योग्य व्यवस्था करण्याची मागणी केली आहे. अन्यथा, तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही निवेदनात देण्यात आला आहे.
निवेदनावर माजी उपनगराध्यक्ष रावसाहेब उर्फ आर.आर.राधुजी तनपुरे, किशोर भुजाडी ,अक्षय रावसाहेब तनपुरे ,दिनेश उंडे , दत्तात्रय गायकवाड ,जिशान शेख ,सत्यवान पासवान ,गणेश खैरे ,अजित डावखर,सागर येवले ,सचिन मेहेत्रे ,राम शिंदे,विक्रम भुजाडी ,नयन शिंगी ,राजेंद्र उंडे आदीच्या सह्या आहेत. नगरपरिषदेने तातडीने लक्ष घालून नागरिकांच्या समस्या सोडवाव्यात, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.