राहुरी वेब प्रतिनिधी ,०९ ( शरद पाचारणे ) –
महाराष्ट्र शासनाच्या महिला व बाल विकास विभागांतर्गत ग्रामपंचायत स्तरावर दिला जाणारा ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्कार’ शनिवार, ३१ मे २०२५ रोजी केंदळ बुद्रुक येथे प्रदान करण्यात आला. शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रातील योगदानाबद्दल हा पुरस्कार अनुक्रमे सौ. सुरेखा बाळासाहेब माकोणे (जाधव सुरेखा केशव) आणि सौ. आरती सोमनाथ फुलारे यांना प्रदान करण्यात आला.
श्री वीरभद्र माध्यमिक विद्यालय केंदळ बुद्रुक येथील शिक्षिका सौ. सुरेखा माकोणे यांना शैक्षणिक क्षेत्रातील कार्यासाठी तर सौ. आरती फुलारे यांना सामाजिक क्षेत्रातील योगदानासाठी सन्मानित करण्यात आले. हा पुरस्कार मा. ग्रामसेविका भिसे मॅडम आणि उपसरपंच विजयकुमार चव्हाण यांच्या शुभ हस्ते प्रदान करण्यात आला.
यावेळी सरपंच गोविंद जाधव, अण्णासाहेब देवरे, लोंढे नानासाहेब, ताराबाई लोंढे, ग्रामपंचायत सदस्य आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. ग्रामसेविका भिसे मॅडम यांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या महान सामाजिक आणि कल्याणकारी कार्याची माहिती दिली. तसेच आजच्या महिलांनीही त्यांचा आदर्श घेऊन कार्य करावे, असे आवाहन करत पुरस्कारप्राप्त महिलांच्या योगदानाचे कौतुक केले आणि त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
उपसरपंच विजयकुमार चव्हाण यांनीही अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या सामाजिक कार्याची माहिती दिली आणि सर्व महिलांना जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या.
पुरस्कार स्वीकारल्यानंतर सौ. सुरेखा माकोणे आणि सौ. आरती फुलारे यांनी या यशामागे श्री वीरभद्र माध्यमिक विद्यालय केंदळ बुद्रुक संस्थेचे अध्यक्ष, मुख्याध्यापक, शिक्षकवृंद, शिक्षकेतर कर्मचारी, सर्व ग्रामस्थ, तसेच बाळासाहेब माकोणे, त्यांचे कुटुंब आणि मित्रपरिवार यांचा महत्त्वपूर्ण वाटा असल्याचे नमूद करत सर्वांचे मनःपूर्वक आभार मानले.