राहुरी व प्रतिनिधी,०८ (शरद पाचारणे) –
राहुरी तालुक्यातील टाकळीमिया येथून पंढरपूरकडे जाणाऱ्या श्री दत्त सेवा पायी दिंडीच्या रथाला पंढरपूरजवळील भोसे गावाजवळ गुरुवारी (३ जुलै) पहाटे पावणेपाचच्या सुमारास एका अज्ञात चारचाकी वाहनाने धडक दिली. या अपघातात चार वारकरी जखमी झाले असून, त्यापैकी एकाची प्रकृती चिंताजनक आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, टाकळीमिया येथील श्री दत्त सेवा पायी दिंडी पंढरपूरकडे जात असताना हा अपघात घडला. अपघातात सुभाष चौधरी , दिलीप आढगळे सुरेश पाचारने भाऊराव शेजूळ हे वारकरी जखमी झाले आहेत. जखमींपैकी सुभाष चौधरी यांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना तातडीने सोलापूर येथील खासगी रुग्णालयात प्राथमिक उपचार करून त्यानंतर पुढील उपचारासाठी अहिल्यानगर येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
अपघाताची माहिती मिळताच स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष रविंद्र मोरे यांनी तात्काळ अहिल्यानगर येथील हॉस्पिटलमध्ये धाव घेतली. त्यांनी जखमी वारकऱ्यांची विचारपूस केली. यावेळी मोरे यांनी अपघातग्रस्त वारकऱ्यांना लोकप्रतिनिधी आणि शासनाने तात्काळ आर्थिक मदत करावी, अशी मागणी केली आहे. तसेच, या वारकऱ्यांच्या उपचारासाठी दानशूर व्यक्ती आणि संस्थांनी पुढाकार घेऊन आर्थिक मदत करावी, असे आवाहनही त्यांनी केले आहे.