राहुरी वेब प्रतिनिधी,१६ ( शरद पाचारणे ) :- अहमदनगर जिल्ह्याचे नाव ‘अहिल्यानगर’ झाल्यानंतर आता विद्यार्थ्यांच्या शाळा प्रवेशात नवीन अडचण निर्माण झाली आहे. डॉ. बाबुराव बापूजी ग्रामीण शिक्षण संस्थेच्या सचिव डॉ. सौ. उषाताई तनपुरे यांनी या गंभीर बाबीकडे जिल्हाधिकारी कार्यालयाने तातडीने लक्ष देऊन मार्ग काढण्याची मागणी केली आहे. बहुतांश विद्यार्थी आणि पालकांच्या आधार कार्डवर अजूनही ‘अहमदनगर’ हेच नाव असल्याने त्यांना आपल्या पाल्यांना शाळेत प्रवेश मिळवण्यासाठी अडचणी येत आहेत.
आज (सोमवार, १६ जून रोजी) राज्यभरात शाळा सुरू झाल्या असून, सर्वत्र नवीन विद्यार्थ्यांचे स्वागत समारंभ सुरू आहेत. याच दरम्यान, राहुरी येथील एका कार्यक्रमात अनेक पालकांनी डॉ. सौ. तनपुरे यांच्या निदर्शनास ही अडचण आणून दिली. संबंधित शाळेच्या मुख्याध्यापकांनीही याला दुजोरा दिल्याने, मुलांच्या शाळा प्रवेशातील हा अडथळा त्वरित दूर करण्याची मागणी डॉ. सौ. तनपुरे यांनी केली आहे.
आधार कार्ड आणि KYC ची अडचण
अहिल्यानगर जिल्ह्यातील शाळा-महाविद्यालयांमध्ये सध्या प्रवेश प्रक्रिया सुरू आहे. या प्रक्रियेत विद्यार्थी आणि पालकांचे आधार कार्ड अनिवार्य करण्यात आले आहे. ‘केवायसी’ (KYC) पूर्तता करताना सर्व ठिकाणी अहमदनगरचे नाव अहिल्यानगर झाले आहे, परंतु आधार कार्डच्या सॉफ्टवेअरमध्ये अद्याप ही दुरुस्ती झालेली नाही. गेल्या दोन महिन्यांपासून जिल्ह्याचे नाव बदलले असले तरी, आधार कार्ड प्रणालीमध्ये हा बदल न झाल्याने प्रवेश प्रक्रियेत मोठा अडथळा येत आहे. या संदर्भात अनेक विद्यार्थी, पालक आणि संस्थाचालकांनी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे तक्रारी केल्या आहेत.
जबाबदारी आणि उदासीनता
अहिल्यानगरमधील उपजिल्हाधिकारी कार्यालयाकडे जिल्ह्यातील आधार केंद्रांची जबाबदारी आहे. मात्र, नुकतीच अहिल्यानगरच्या उपजिल्हाधिकारी यांची बदली झाली असून, त्यांच्या जागी नवीन अधिकारी रुजू झाले आहेत. साधारणतः दोन महिने उलटूनही याबाबत कोणतीही कारवाई किंवा कार्यवाही न झाल्याने अहिल्यानगरच्या नावामुळे येणारी अडचण विद्यार्थी, पालक आणि संस्थाचालकांसाठी डोकेदुखी ठरली आहे. आधारचे मुख्य केंद्र असलेल्या ‘यूआयडीएआय’ (UIDAI) कडूनही अद्याप कोणतीही कारवाई झालेली नाही. विशेष म्हणजे, अहिल्यानगर जिल्हाधिकारी कार्यालयाने ‘यूआयडीएआय’ला या बदलाची माहिती देणे अपेक्षित आहे, परंतु तसे न झाल्याने समस्या कायम आहे. त्यामुळे प्रवेश प्रक्रियेत अनेक ठिकाणी बाधा येत आहे.
७७ नवीन आधार किट संचांचे वाटप रखडले
अहिल्यानगरच्या जिल्हाधिकारी कार्यालयात नगर जिल्ह्यातील ७७ नवीन आधार किट संच उपलब्ध असल्याची माहिती आहे. त्यापैकी काही राहुरी तालुक्यातील असल्याचे समजते. परंतु, उपजिल्हाधिकारी यांच्या बदलीमुळे नवीन उपजिल्हाधिकारी कार्यालयाकडून याबाबत पुढील पाठपुरावा न झाल्याने हे नवीन आधार किट संच अद्याप वाटप झालेले नाहीत. यामुळे सध्या बहुतेक ठिकाणी विद्यार्थी, पालक आणि नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे.
सध्याचे सरकार नागरिकांसाठी ‘गतिमान’ असल्याचा दावा करत असले तरी, ही स्थिती पाहता सरकारचा दावा फोल ठरला की काय, अशी शंका विद्यार्थी आणि पालक वर्गात व्यक्त होत आहे. अहिल्यानगरला नव्याने जिल्हाधिकारी रुजू झाले असून, त्यांच्या कार्यालयाकडून संबंधित विद्यार्थ्यांची ही अडचण त्वरित दूर व्हावी, अशी अपेक्षा विद्यार्थी, पालक आणि संस्थाचालकांकडून केली जात आहे.