राहुरी वेब प्रतिनिधी,४ (शरद पाचारणे ): राहुरी तालुक्यातील गुहा येथे जमिनीच्या कारणावरून झालेल्या वादातून एका कुटुंबाला मारहाण झाल्याची घटना १ जून २०२५ रोजी घडली. या प्रकरणी मंदा कैलास सौदागर यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, राहुरी पोलिसांनी चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, १ जून २०२५ रोजी सायंकाळी ६:३० ते ६:४० च्या सुमारास मंदा सौदागर आणि त्यांचे पती कैलास सौदागर हे त्यांच्या शेतात नांगरट करत असताना, त्यांचे शेजारी रविंद्र ज्ञानदेव काकडे आणि जालिंदर ज्ञानदेव काकडे हे त्यांच्या सामायिक रस्त्यावर आले. त्यांनी सौदागर दाम्पत्याला रस्त्याच्या कडेला नांगरट करू नका असे सांगितले. यावरून त्यांच्यात वाद सुरू झाला. वादाचे रूपांतर भांडणात झाल्यानंतर लिलाबाई ज्ञानदेव काकडे आणि कुनाल रविंद्र काकडे हे देखील घटनास्थळी आले. त्यांनीही शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. जालिंदर ज्ञानदेव काकडे याने कैलास सौदागर यांच्या पाठीत लाकडी काठीने मारहाण केली आणि जीवे मारण्याची धमकी दिली. रविंद्र काकडे आणि कुनाल काकडे यांनी कैलास सौदागर यांना खाली पाडून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. लिलाबाई काकडे हिने मंदा सौदागर यांचे केस धरून त्यांना खाली पाडले आणि हाताने मारहाण केली.
या भांडणाचा आवाज ऐकून शाम बाळासाहेब सौदागर, दिलीप बापू सौदागर, विकास बापू सौदागर, सोपान दादा सौदागर आणि इतर शेजारी घटनास्थळी आले व त्यांनी भांडण सोडवले. मारहाणीमुळे कैलास सौदागर यांच्या बरगड्या आणि पायांच्या पोटऱ्या दुखू लागल्याने, तसेच पती-पत्नी दोघेही घाबरले असल्याने त्यांनी तात्काळ पोलिसात तक्रार दिली नाही. फिर्यादीचे पती कैलास सौदागर यांना बरे वाटल्यानंतर, ३ जून २०२५ रोजी मंदा सौदागर यांनी राहुरी पोलीस ठाण्यात येऊन रविंद्र ज्ञानदेव काकडे, जालिंदर ज्ञानदेव काकडे, लिलाबाई ज्ञानदेव काकडे आणि कुनाल रविंद्र काकडे (सर्व रा. गुहा, ता. राहुरी, जि. अहिल्यानगर) यांच्या विरोधात फिर्याद दिली. पुढील तपास पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली राहुरी पोलीस करत आहेत.