५० टक्क्यापेक्षा जास्त रिक्त पदे असल्याने विद्यापीठाच्या कार्यावर विपरीत परिणाम – मा.खा.प्रसाद तनपुरे

राहुरी वेब प्रतिनिधी २५,(शरद पाचारणे)- 

कृषी विद्यापीठाचे संशोधन कार्य शेतकऱ्यांच्या जीवनात क्रांती करणारे ठरते.  संशोधन कार्याचा महायज्ञ विना व्यत्यय अखंडित चालू  राहिला पाहिजे, तरच कृषी विद्यापीठाच्या स्थापनेचा उद्देश सफल होईल. कृषी विद्यापीठात ५० टक्क्यापेक्षा जास्त रिक्त पदे आहेत. त्याचा शिक्षण, संशोधन व प्रसारण कार्यावर विपरीत परिणाम होत आहे.  विद्यापीठात संशोधनातील अपुऱ्या मनुष्यबळामुळे अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. जैवतंत्रज्ञान केंद्रास निधीची देखील चणचण भासत असल्याचे माजी खासदार प्रसाद तनपुरे यांनी खंत व्यक्त केली.

      महात्मा फुले कृषी विद्यापीठात मनुष्यबळ अपुरे असतांना शिक्षण व संशोधन कार्याचा महायज्ञ अखंडित सुरू आहे.  त्यामागे कृषी शास्त्रज्ञांची कामाप्रती समर्पित भावना, निष्ठा, मेहनत कौतुकास्पद आहे. त्यांना संशोधन कार्याला बळ देण्यासाठी शासनाने मनुष्यबळ उपलब्ध करून देणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन माजी खासदार प्रसाद तनपुरे यांनी केले.

       महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या जैवतंत्रज्ञान व कृती संवर्धन विभागाला भेट देऊन पाहणी प्रसंगी तनपुरे बोलत होते. प्रमुख शास्त्रज्ञ प्रा. डॉ. अनिल काळे, प्रा. डॉ. विवेक चिमोटे, प्रा. डॉ. अधीर आहेर उपस्थित होते. त्यांनी पदव्युत्तर महाविद्यालयातील एमएससी व पीएचडीच्या विद्यार्थ्यांशी संवाद साधून संशोधन कार्यात येणाऱ्या अडचणींची माहिती घेतली. 

     प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. अनिल काळे यांनी सोयाबीन, ऊस, कांदा, भात आदी पिकांमध्ये चालू असलेले तसेच आतापर्यंत झालेल्या संशोधनाची माहिती दिली.  डॉ. चिमोटे व डॉ. आहेर यांनी उती संवर्धन विषयी संशोधन व उत्पादन बाबत माहिती दिली. उद्यान विद्या विभागाचे प्रमुख डॉ. बी. टी. पाटील यांनी मोसंबी, कांदा व लसूण पिकांच्या संशोधनाबाबत माहिती दिली. 

       तनपुरे यांनी सूक्ष्म अन्नद्रव्ये संशोधन योजनेस भेट दिली. तेथे उत्पादित सूक्ष्म अन्नद्रव्ये फुले ग्रेड-२ बाबत समाधान व्यक्त केले.  यावेळी मृद विज्ञान विभाग प्रमुख डॉ. भीमराव कांबळे, डॉ. अनिल दुर्गुडे, डॉ. गणेश शेळके उपस्थित होते. दत्तात्रय कदम यांनी विविध फळझाडे, रोपे, बियाणे बाबत माहिती दिली. 

     विद्यापीठात संशोधनातील अपुऱ्या मनुष्यबळामुळे अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. जैवतंत्रज्ञान केंद्रास निधीची देखील चणचण भासत आहे.  या केंद्राच्या उभारणीसाठी तत्कालीन अर्थमंत्री जयंत पाटील यांच्याकडे पाठपुरावा करून भरीव निधी उपलब्ध करून दिला होता.  तत्कालीन केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनीही विद्यापीठाला संशोधन कार्याच्या साहित्य, यंत्रसामुग्री, इमारतींसाठी भरीव निधी दिला. अशी आठवण तनपुरे यांनी करून दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *